पंढरपुरात वारकऱ्यांना होणारा त्रास थांबवा

अखिल भाविक वारकरी मंडळाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

पंढरपुरात वारकऱ्यांना होणारा त्रास थांबवा

सोलापूर : प्रतिनिधी

वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी अखिल भाविक वारकरी मंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. गुरूवारी याबाबतचे निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना दिले.

श्री क्षेत्र पंढरपूर येथे वर्षभरात चारही वाऱ्यांना वारकरी भाविक ६५ एकर मधील प्लॉट घेऊन तीन ते पाच दिवस नित्य नेम करण्यासाठी मुक्कामी राहता. त्याचठिकाणी तेथे भजन, कीर्तन प्रवचन इ. कार्यक्रम करतात . तो आनंद स्वर्गातही नाही अशी वारकरी भाविकांची धारणा आहे. पूर्वी नदी वाळवंटामध्ये हे सर्व कार्यक्रम केले जात होते. व ते सर्वजण तेथेच रहात होते. परंतु स्वच्छतेचे कारण सांगून सर्वांना ६५ एकरमधील प्लॉटमध्ये राहण्यासाठी ती जागा खुली केली आहे असे कोर्टात सांगण्यात आले आहे. पण ६५ एकर मधील प्लॉट घेण्यासाठी वारकरी भाविकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक वारीला तीन महिन्यातून एकदा प्लॉट घेण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत आहे. प्रत्येक वारीला त्या जागेवर दिंडी वेगवेगळी असते. सध्या प्रत्येक वारीला प्रत्येक दिंडीला वेगवेगळा प्लॉट देण्यात येत आहे. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या भाविकांना मंडप सापडणे कठीण होते आहे.

एका दिंडीला फक्त तीन दिवस तो प्लॉट मिळणे अपेक्षीत आहे. त्यामुळे ६५ एकरमधील प्लॉट संबंधित दिंडीला कायमस्वरुपी निश्चित करण्यात येऊन अर्ज एकदाच घेऊन त्यांची नोंद कायम स्वरुपी करण्यात यावी. ६५ एकरमधील प्लॉट संदर्भातील त्रास संपवून भाविकांना वारी कालावधीमध्ये नित्यनेम करण्यासाठी सहकार्य करावे, असे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर येथे ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे यांनी अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या माध्यमातून दिले. त्यावेळी त्यांनी या प्लॉट वाटप संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.