महाविकास आघाडीने पुकारला शनिवारी महाराष्ट्र बंद

नागरिकांना काय केले आहे आवाहन ? : काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांची माहिती

महाविकास आघाडीने पुकारला शनिवारी महाराष्ट्र बंद

सोलापूर : प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्यात मुलींवर आणि महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू आहेत. बदलापूर येथील घटना त्याचेच एक उदाहरण आहे. वाढत्या महिला अत्याचाराच्या आणि असंवेदनशील सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शनिवार २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या बंदमध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहनही शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केले.

ठाणे जिल्हयातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली आहे. या अमानवी कृत्याविरोधात राज्यभरात मोठ्या प्रमाणात संतापाचे लाट उसळली आहे. सत्ताधारी लोकांशी संबधित लोक यामध्ये सहभागी असल्याने पोलिस प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पिडीत मुलीच्या आईची तक्रार दाखल करून घेण्याऐवजी पोलिसांनी त्या गरोदर मातेला ११ तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. हे पोलिस आणि सरकारच्या गलथान कारभाराचे आणि असंवेदनशीलचे ज्वलंत उदाहरण आहे. राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्या जिल्ह्यातच माता- भगिनी, महिला सुरक्षित नाहीत. तर राज्यातील इतर भागात कायदा व सुव्यवस्था कशी असेल ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दिनांक २० ऑगस्ट रोजी या घटनेच्या विरोधात संतप्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बदलापूरमध्ये आंदोलन करून रेल रोको केला. पण सरकाराकडून मात्र हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरीकांनी हे प्रकरण लावून धरल्याने सरकारला नाईलाजाने कारवाई सुरूवात करावी लागली.

राज्यभरात मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलींवर अत्याचार सुरू आहे. सरकार आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. महिला, मुलींना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बदलापूरचा या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे.

तरी सोलापूर शहरातील नागरिक बंधू-भगिनींनी व व्यापारी, दुकानदारांनी बंद मध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे तसेच महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बंद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी याप्रसंगी केले.

या पत्रकार परिषदेस माजी आमदार नरसय्या आडम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया, शिवसेना शहर प्रमुख दत्तात्रय वानकर, रेवण पुराणिक आदी उपस्थित होते.